मुंबई, 1 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत अजितदादा भाषण करणार का नाही? याबाबत सस्पेन्स कायम होता, पण अजितदादांनी भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यासाठी कुणी काम केलं असेल तर ते हिंदुह्रदयसम्राट बाळाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहिला. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच काही लोकांना पटत नाही. त्यामुळे त्यांनी फोडायचं राजकारण सुरू केलं. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान योग्य राहणार का, कायदा राहणार का, घटना राहणार का, याचा विचार केला पाहिजे’, असं अजित पवार म्हणाले.
पोटनिवडणुका असेल किंवा बाजार समिती निवडणुकीत आपण चांगलं यश मिळवलं असून जनता आपल्यासोबत आहे. आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. कोरोनाच्या संकटात आपण चांगलं काम केलं. आर्थिक शिस्त आम्ही कुठेही मोडली नाही. 31 मार्च 1 हजार कोटींची बिलं या सरकारने देण्याची थांबवली आहे. कंत्राटदारांना यांनी थांबवलं, कोण याला जबाबदार आहे? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
…आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video
माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे, पण त्यांना मदत करण्याची सरकारीच भूमिका नाही. शिंदे फडणवीस काय करत आहेत? त्यांचं काम नाही का? शेतकऱ्यांची पिक उद्धवस्त झाली आहेत, परंतु, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. फडणवीस शिंदे काय करत आहेत, त्यांचं हे काम नाही का? पण यांना बाकीच्या कामांमध्ये रस आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.
सरकारला 10 महिने झाले आहे, पण हे सरकार निवडणूक घेत नाही. या सरकारला निवडणुकींची भीती वाटत आहे. निवडणुका का घेत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाही. भीती कशाची वाटत आहे. का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाही. आता तर पाऊसपण नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर जनता काय करेल, याचा विश्वास या सरकारला नाही. म्हणून शिंदे सरकार निवडणुका घेत नाही, असा आरोपही अजित पवारांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.