पुणे, 16 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत. आता यावर खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवार अजिबात नारज नाहीत, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची जी सभा झाली त्या सभेत जयंत पाटील बोलले नाहीत मग ते नाराज होते असं म्हणायचं का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मविआच्या प्रत्येक सभेत दोनच जण बोलणार हे आधीपासूनच ठरलं होतं. यामुळे अजित पवार हे नाराज असल्याच्या सर्व आफवा आहेत. ज्या झाडाला आंबे त्याच झाडाला लोक दगड मारतात.
अजित पवारांची प्रतिक्रिया
आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांनी बसून ठरवलं होतं की राज्यात सहा ते सात सभा घ्यायच्या. त्याची सुरुवात मराठवाड्यातून झाली. आज नागपूरमध्ये दुसरी सभा आहे. सभांना घेऊन माध्यमं विविध बातम्या चालवत आहेत. पण सगळी माहिती घेऊन बातम्या चालविल्या तर बरं होईल, एका सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच मान्यवर भाषण करतील असं आधीच ठरलं होतं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, आजच्या सभेत स्थानिक नेते म्हणून अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलणार आहेत. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोललो त्यामुळे आजच्या सभेत बोलणार नाही. काँग्रेसकडून कोण दोन नेते भाषण करतील ते मला माहिती नाही. नाना पटोले आणि सुनील केदार हे बोलण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आणखी कोण बोलणार हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. सभा आटोपशीर व्हावी जास्त लांब होऊ नये, कार्यकर्त्यांना व्यवस्थित ऐकता यावं हा त्यामागचा हेतू असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.