मुंबई, 17 मे : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई महानगरपालिकेतील लूट, रस्ते घोटाळा थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी हे पत्र लिहिलं आहे. दरम्यान या पत्रातून त्यांनी महानगरपालिका प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. या अगोदर आदित्य ठाकरेंनी पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती.
आदित्य ठाकरेंचं राज्यपालांना पत्र
मुंबई महानगरपालिकेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत खुलेआम सुरु असलेला भ्रष्टाचार व मुख्यमंत्री कार्यालयातून त्या भ्रष्ट कामांची हलवली जाणारी सूत्रं याविषयी आपणांस विस्तृत माहिती देण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.
तुमच्या शहरातून (मुंबई)
महोदय, आम्ही आपली भेट घेऊन दिलेल्या निवेदनाचा परिणाम म्हणून मुंबई महानगरपालिकेने केवळ एक प्रेस नोट जारी केली आहे. ज्यात काही संदर्भहीन स्पष्टीकरण आहे. मात्र गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार थांबलेला नाही. खरं तर आत्ताचे भ्रष्ट रोड मेगा टेंडर रद्द केले गेले पाहिजे आणि निवडून आलेली प्रतिनिधी समिती किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीच्या पारदर्शक पद्धतीने पुन्हा नव्याने जारी करायला हवे. असे दिसते आहे की लोकशाही पद्धतीने नगरसेवक निवडून येण्याआधीच मुंबईचा पैसा जास्तीत जास्त खर्च करता यावा यासाठी मुंबई महानगर पालिका आणि प्रशासन यांवर उच्चपदस्थांकडून दबाव आणला जात आहे.
हा पैशांचा अपव्यय थांबवला जावा ह्यासाठी आपल्या राज्यपाल कार्यालयातर्फे माननीय लोकायुक्तांना आम्ही दिलेली याचिका पाठवली जावी अशी आमची विनंती आहे. महोदय, आमची आपणास नम्र विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारात आपण हस्तक्षेप करावा आणि कंत्राटदारांना अनावश्यक वाटली जात असलेली 600 कोटी रुपयांची अॅडव्हान्स मोबिलिटी रक्कम त्वरित रोखावी.
सामान्यतः देशातील ग्रीन फिल्ड कामांना आणि महामार्गांना अॅडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून आगाऊ रक्कम दिली जाते, मुंबईसारख्या शहरांना नाही.
महोदय जिथे 900 पैकी 25 रस्त्यांची कामेही सुरु झालेली नाहीत तिथे आगाऊ रक्कम देणे हा करदात्यांच्या पैशांचा अक्षम्य अपव्यय ठरेल आणि कंत्राटदार आणि ज्यांना किकबॅक मिळण्याची शक्यता आहे, त्यांनाच यातून फायदा होईल.
महामहिम महोदय मुंबईकरांच्या वतीने आपण मुंबई महानगरपालिकेच्या या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करावा आणि जोवर रस्त्यांची कामे सुरु होत नाहीत तोवर कुणालाही आगाऊ रक्कम दिली जाऊ नये ही आज्ञा द्यावी अशी आपणास विनंती आहे.
असं पत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांवर महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये, निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार नाही, आरोपांना पालिकेनं समर्पक उत्तर दिली आहेत.
पालिकेवर जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित होत आहेत, असं महापालिकेचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.