मुंबई, ता, २५ फेब्रुवारी
ईडीची कुठलीही कारवाई होते तेव्हा महिन्याअगोदरच त्या कारवाईसंबंधीच्या बातम्या बाहेर कशा येतात? दहावीचा एखादा पेपर फुटला की परीक्षा रद्द होते. शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. मग ईडी कारवाईच्या बातम्या बाहेर येतात तेव्हा ईडीचा पेपर फुटल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मुंबई येथे आयोजित धरणे आंदोलनात त्या बोलत होत्या.
ईडीच्या बातम्या भाजपच्या नेत्यांना कशा मिळतात याची चौकशी व्हावी, अशी मागणीही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कोणताही व्यक्ती एकदा मंत्री झाला की तो पक्षाचा न राहता देशाचा मंत्री होतो. मा. अमित शाह हे देशाचे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे एक महिला म्हणून मी न्याय मागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षातील काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भाजपची पोलखोल बऱ्याच काळापासून नवाब मलिक करत आले आहेत. त्यामुळे त्यांना सतत धमक्या मिळत होत्या. जेव्हा नवाब मलिक धमक्यांना जुमानत नाहीत असे दिसायला लागले तेव्हा त्यांच्यावर खोट्या आरोपांची राळ उठविण्यात आली, असेही त्या म्हणाल्या.
आमचे सरकार दडपशाहीचे सरकार नाही. विरोधकांनी विरोध करत राहावा त्यांचा तो अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकारला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ती आम्ही करत राहणार. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना आम्ही फार गांभीर्याने घेत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.