मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला रविवारी लाखो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उष्माघाताचा त्रास झाल्यानं अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जणांवर उपचार सुरू आहेत. यानंतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची वेळ योग्य ती ठरवायला हवी होती. भर दुपारी कार्यक्रम घेणं चुकीचं होतं. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतरही असं घडायला नको होतं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अजित पवार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कार्यक्रमाच्या तयारीचा दोन-तीन वेळा आढावा घेतला होता. सरकारी कार्यक्रम होता. त्यासाठी जवळपास १४ कोटी रुपये खर्च केले. माझ्या माहितीनुसार आजपर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्काराला इतकी मोठी रक्कम खर्च केली गेली नाही. पण इतका खर्च केल्यानंतरही असा प्रकार घडायला नको होता. बस, गाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या.
कार्यक्रमाच्या वेळेवरूनही अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले. सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. जेव्हा एखादा कार्यक्रम घेतला जातो तेव्हा तुम्ही जी वेळ सुचवलीत की ती वेळ आताच्या वातावरणात योग्य नाही. ती चार ती पाचच्या सुमारास असायला हवी होती. पुरस्कार देणाऱ्यांनी योग्य वेळ सांगायची असते असं ते म्हणाले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा : उष्माघाताने 11 जणांचा मृत्यू, राज्य सरकारकडून मदत जाहीर
आकडा लपवण्यात अर्थ नाही
उष्माघाताचा त्रास नेमका किती लोकांना झाला, मृ्त्यू किती झाले याबाबतच्या आकडेवारीबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही आकडे लपवायचे नाही. जे काही घडेल ती वस्तुस्थिती लोकांना सांगायची. एमजीएम पनवेल, वाशी, डीवाय पाटील आणि टाटा हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत. आधी संख्या खूप मोठी होती. अफवांचं पेवही फुटलं होतं. आम्ही वज्रमूठ सभा घेत असताना आम्हाला २० पर्यंत मृतांची संख्या गेल्याचं सांगण्यात येत होतं.
अनेक जण उपाशी, तीव्र ऊन
रुग्णालयातील रुग्णांशी आम्ही प्रत्यक्ष बोललो तेव्हा बहुतांशजण पालघर, ठाणे, मुंबई, लोणावळा इथले होते असं समजलं. काही जण म्हणाले, आमच्या पोटात काही नव्हतं, फक्त फळे खाल्लेली, पाण्याची व्यवस्था होती पण उन्हाची तीव्रता जास्त होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. काहींना तर नंतर काय झालं ते कळलं नाही, आपण थेट दवाखान्यातच आणल्याचं कळलं अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
कार्यक्रमाची वेळ दुपारची हे चुकीचं होतं
गाडी कुणी पाठवली माहिती नाही. तीन चार गाड्या आल्या. आम्ही पुरुष स्त्रिया त्यात बसलो आणि आलो. काही जण १५ तारखेला रात्री आले. त्यांची तिथं व्यवस्था काय होती माहिती नाही. पण गर्दी खूप होती आणि उन्हाची तीव्रता अतिशय होती. भर दुपारची वेळ कार्यक्रमासाठी निवडणं हे चुकीचं होतं. आता त्याची चर्चा करून चालणार नाही. अजून आकडा नीट समोर आलेला नाही. यात लपवालपवी करण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, आता प्रशासन त्यावर वेगळं काही सांगणार नाही असेही अजित पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.