मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप राजीनाम्यासाठी आक्रमक आहे तर राष्ट्रवादीच्या गोठातही यावरून बैठक सत्र पार पडलं.यात नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली . दरम्यान, नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले असून त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार हा इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच मुंबई अध्यक्षपदाचा कार्यभारही महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव आणि नरेंद्र राणेंकडे सोपवण्यात आला आहे. राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी तात्पुरती इतरांकडे देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार त्यांच्या खात्याचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात येणार आहे. नवाब मलिक हे सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येणार आहे.
पक्षाची बैठक झाल्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलंय. जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही पर्यायी व्यवस्था असेल. नवाब मलिक हे बिनखात्याचे मंत्री म्हणून राहतील. मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. पेनड्राईव्ह प्रकरणी खरे-खोटेपणा तपासल्यावर बोललं पाहिजे. फॉरेन्सिक अहवाल हाती आल्याशिवाय आणि सत्यता न तपासता लोकांपुढे मत मांडण हे चुकीचं असल्याचं जयंत पाटील म्हणाले.