मुंबई 31 मार्च : मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वे वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र आहे. ब्रिटिश वास्तू विशारद क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केलेलं हे स्थानक स्थानिक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही गाड्यांसाठीचा एक प्रमुख ‘थांबा’ आहे. 1997 मध्ये बॉम्बेचं मुंबई असं नामकरण केल्यानंतर या स्थानकाचं नाव ‘बॉम्बे सेंट्रल’वरून मुंबई सेंट्रल असं करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा या रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा विचार सुरू आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून त्याला ‘नाना शंकरशेठ’ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला मिळाला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली.
या प्रकरणी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये विविध सरकारी संस्थांच्या शिफारशी आणि इतर संबंधित घटकांचा योग्य विचार करून निर्णय घेतला जातो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, महिनाभर पाण्यासाठी होतील हाल
तुमच्या शहरातून (मुंबई)
एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना नित्यानंद राय म्हणाले, “मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव नाना शंकरशेठ मुंबई सेंट्रल टर्मिनस असं करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीसह एक प्रस्ताव केंद्राला मिळाला आहे. विविध सरकारी संस्थांच्या शिफारशी आणि इतर संबंधित घटकांचा योग्य विचार करून याबाबत निर्णय घेतला जाईल. या संदर्भात मुंबईतील नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेठ प्रतिष्ठानकडून केंद्र सरकारला अद्याप कोणतंही निवेदन मिळालेलं नाही.”
जगन्नाथ (नाना) शंकरशेठ मुरकुटे (1803-1865) हे महाराष्ट्रीय समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी मुंबईच्या विकासात खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मुंबईच्या पूर्वीच्या विधानपरिषदेवर नामनिर्देशित झालेले पहिले भारतीय होते. त्यांनी भारतीय रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या पूर्वी, दक्षिण मुंबईतील एका चौकाला (नाना चौक) त्यांचं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय, मुंबईतील एशियाटिक सोसायटीत त्यांच्या सन्मानार्थ एक संगमरवरी पुतळा उभारण्यात आलेला आहे.
रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांची हरकत नसल्यास केंद्रीय गृह मंत्रालय कोणत्याही ठिकाणाचं किंवा स्थानकाचं नाव बदलण्यास परवानगी देते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या संस्थांना त्यांच्या नोंदींमध्ये प्रस्तावित नावासारखं नाव असलेलं कोणतंही शहर किंवा गाव नाही ना याची खात्री करावी लागेल.
राज्याचं नामांतर करण्यासाठी संसदेत साध्या बहुमतानं घटना दुरुस्ती करावी लागते. मात्र, एखाद्या गावाचं, शहराचं किंवा स्टेशनचं नाव बदलण्यासाठी कार्यकारी आदेशाची आवश्यकता असते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
मुंबई सेंट्रल टर्मिनस हे पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे वाहतुकीला जोडणारं महत्त्वाचं केंद्र आहे. या ठिकाणाहून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीरसह संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे गाड्या धावतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.