मुंबई, 20 एप्रिल : खारघर येथे आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे तब्बल 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर हे मृत्यू केवळ उष्माघातामुळे झाले नसून अयोग्य व्यवस्थापनामुळे झाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यातील काहींचे शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शवविच्छेदनातून धक्कादायक माहिती समोर
तुमच्या शहरातून (मुंबई)
खारघर मधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात वेगवेगळा त्रास होऊन 14 जणांचा मृत्यू झाला होता. यातील काहींचे शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आले आहेत. उष्माघातासह शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. अनेकांना उशिरापर्यंत पाणीच मिळाले नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. कार्यक्रमस्थळी सुविधा नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. अशातच आता शवविच्छेदन अहवालातूनही अशाच बाबी समोर आल्याने आता विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांचे राज्यपालांना पत्र
घटनेनंतर मी प्रत्यक्ष जखमी, मृतांचे नातेवाईक आणि डॉक्टरांची भेट घेतली होती. तसेच इतर मागण्यांसह या घटनेची न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली होती. सुरुवातील उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र, आता सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माडियाच्या माध्यमातून तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांकडून वेगळीच माहिती समोर येत आहे. या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थित अनुयायांसाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. श्रीसदस्य 7 तास अन्नपाण्याशिवाय होते. त्यामुळे अनेकांना त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्यामुळे रुग्णवाहिका रग्णापर्यंत पोहचू शकली नाही. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उन्हात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम करण्याचा अनुभव नव्हता. या सर्व गोष्टींची शहानिशा करुन सत्य जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
वाचा – नवी मुंबईत लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे ‘शाही’ भोजन; राष्ट्रवादीकडून तो फोटो ट्विट
हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे शासनाने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले. राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा वर चढलेला आहे. अशात असा कार्यक्रम घेण्यासाठी सर्व शक्यतांची पडताळणी शासनाकडून होण्याची आवश्यकता होती. ती न झाल्यामुळे 14 अनुयायांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा. तसेच या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.