मुंबई, 25 मार्च : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, सरकारकडून विरोधकांना छळण्याचं काम सुरू असल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. माझ्या मागे एसआटी लावली, माझ्यावर जेवढ्या काही केस दाखल आहेत त्या सर्व खोट्या आहेत. माझं नाव घेण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे. मला रात्रभर आंदोलन करावं लागलं, पण अजूनही गुन्हा नोंदवला नाही. राज्यात विरोधकांना छळण्याचं काम सुरू आहे. एक जण बोलला की खडसे कुटुंबावर गुन्हे दाखल होणार आहेत, हे राज्यात काय सुरू आहे? असा सवाल एकनाथ खडसे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच काही लोक म्हणतात तुम्ही देशद्रोह्यांसोबत बसता, असं कोणी कसं म्हणून शकतं? मग अनिक्षा जयसिंघानियाच्या इतक्या दिवस संपर्कात होते ते कसं चाललं असं म्हणत खडसे यांनी फडणवीसांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
राजू शेट्टींचा टोला
दरम्या दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर भाजपला टोला लगावला आहे. तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे तुम्ही यंत्रणाचा वापर करता. मात्र तुम्ही देखील विरोधी पक्षात जाणार आहात तेव्हा तुमचीही अशीच अवस्था होईल असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.