मुंबई, 17 मे : आयपीएल 2023 मध्ये काल लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात लखनौने मुंबईचा पराभ वकरून त्यांचा विजयी रथ रोखला. यामुळे परिणामी आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये मुंबई संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली. मुंबईने लखनौ विरुद्धचा सामना हरल्यानंतर मुंबईची प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार याबद्दल मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना चिंता लागून राहिली आहे. तेव्हा प्लेऑफमध्ये जाण्याबाबत कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यानंतर भाष्य केलं आहे.
लखनौ येथील एकना स्टेडियमवर पारपडलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने अनेक चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे त्याला सध्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. रोहितने संघाची धाव संख्या कमी असताना देखील कॅमेरून ग्रीन या महत्वाच्या खेळाडूला खूप उशिरा मैदानात उतरवले. त्यामुळे मुंबईच्या धावगतीमध्ये फरक पडला. जर मुंबईने लखनौ विरुद्ध सामना जिंकला असता तर त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले असते. परंतु आता मुंबईला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार असून त्यांचे प्ले ऑफमध्ये जाणे हे दुसऱ्या संघांच्या खेळीवर देखील अवलंबून असणार आहे.
लखनौ विरुद्धचा सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये कसा पोहोचेल, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित म्हणाला की, “प्ले ऑफची समीकरण कशी आहेत आणि ती कशी अंमलात उतरतील, याबाबत मला काहीच माहिती नाही. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, आमचा अखेरचा साखळी सामना शिल्लक आहे आणि तो सामना आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. आम्ही मैदानात उतरू आणि सामना जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करू.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.