मुंबई, 17 मे : आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही समोर आलं आहे.
राष्ट्रवादीच्या या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसमोर एक मजबूत पर्याय यामुळे निर्माण होणार आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे, त्या मतदारसंघांची जबाबदारी पक्षाच्या वतीनं नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
विभागानुसार नेत्यांवर जबाबदारी
नागपूर विभागाची जबाबदारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणे यांच्या कडे देण्यात आली आहे. तर नाशिक अहमदनगरसह मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे विभागाची जबाबदारी सुनील शेळके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये अशोक पवार तर खानदेशची जबाबदारी एकनाथ खडसे आणि अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कोकण विभागाची जबाबदारी अनिकेत तटकरे आणि शेखर निकम यांच्याकडे देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.