राज्यातील वातावरण पाहता लोकसभेसोबतच राज्यातील विधानसभा निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
Aurangabad : राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या देखील निवडणुका होणार असल्याचा मोठा दावा केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी दानवे यांनी हे विधान केलं आहे.
भाजपच्या नवनिर्वाचित सरपंचांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांचे या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसांपासून मध्याविधी निवडणूक लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच दानवे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या राजकीय करियर बद्दल बोलताना दानवेंनी अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.