देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहे. त्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला. पण यातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणारे पत्र पाठवले आहे. या पत्रात देवेंद्र फडवणीस यांचं त्यांनी अभिनंदन केलेय. त्याशिवाय पक्षाच्या निर्णायासाठी घेतलला निर्णय कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
काय लिहिलं आहे पत्रात ?
श्री. देवेंद्र फडणवीस
उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
यांसी सन्हेस जय महाराष्ट्र!
प्रिय देवेंद्रजी,
सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो…
तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारुन, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेतली. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरचं अभिनंन!
आता जरा आपल्यासाठी –
ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माधार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे.
एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तुत्व महाराष्ट्रपुढे सिद्ध केलेलंच आहे, त्यामुळे देशाच्या भल्यासाठी तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मन:पूर्वक अभिनंदन!
आपला मित्र
राज ठाकरे