चंद्रपूर : जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव- वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढल्या असून, अनेकांचा बळी गेला आहे. वनमंत्री व वनविभाग मानव-वन्यजीव संघर्षातून होणारी जीवितहानी टाळण्याऐवजी मानवी जीवनाची किंमत पैशात मोजून थट्टा करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संघर्षाच्या घटनांना पायाबंद न घातल्यास वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन करून निषेध नोंदविणार असल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने नटलेला असून येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची ख्याती सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. ताडोबा पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असले तरीही व्याघ्र प्रकल्पासोबतच वनालगतच असलेल्या गावांना मात्र येथील वन्यजीव काळ ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपण पालकमंत्री असताना टायगर सफारी व रेस्क्यू सेंटरसाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. जेणेकरून या उपाययोजनांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टाळता यावे, यासारखे विशेष महत्वपूर्ण प्रयत्न चालविले होते.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या विक्रमी स्वरूपात आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागात तसेच शेतशिवार, मानव वस्तीत वाघाचे भ्रमण सुरु असल्याने दहशत पसरली आहे. अशातच आठवड्यातून किमान दोन हल्ल्यात मनुष्यांना प्राणास मुकावे लागत असल्याच्या ताज्या घटना आहे. आजवर जिल्ह्यात हिंस्त्र पशूंच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात पोहोचली आहे.मात्र, वनमंत्री व वनविभागाने हिंस्त्र पशूहल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केवळ आर्थिक मदतीपलीकडे काहीच केले नाही.
यावर प्रशासनाला माणूस महत्त्वाचा किंवा वाघ, असा प्रश्न आ. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. तसेच मानवी जीवाचे मूल्य पैशाच्या तराजूत तोलण्याचे निष्ठुर व निर्दयी कार्य सरकारकडून चालविले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, आरक्षित वन व इतर वनालगत गावातील मानव-वन्यजीव संघर्ष यातून होणारी जीवितहानी याला विशेष उपाययोजनेतून आळा न घातल्यास नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी, निष्क्रिय वन प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून उठविण्यासाठी रस्त्यावर उतरून वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.