Ichalkaranji Accident : घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना झाले आहेत
Ichalkaranji : इचलकरंजीतील विद्यार्थ्यांच्या बसचा (Picnic Bus Accident) बारामती तालुक्यात (Baramati) अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.
इचलकरंजी विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना
मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी येथील सागर क्लासेसच्या आठवी ते दहावीच्या मुलींची शिर्डी-औरंगाबाद अशी सहल काढण्यात आली होती. शिर्डीहून इचलकरंजीकडे परत जाताना पाहुणेवाडीतील पूलावरुन ही बस कोसळली. या अपघातात 24 मुली किरकोळ, तर 3 मुली गंभीर जखमी झाल्याचे समजते. यामध्ये 48 मुली, पाच शिक्षक आणि कर्मचारी सहलीत सहभागी झाले होते. घटनेची माहिती मिळताच सागर क्लासेसच्या बाहेर मोठी गर्दी पालकांनी केली आहे. तर इचलकरंजीतील विद्यार्थ्यांचे पालक बारामतीकडे रवाना झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी देखील घडली अशीच एक दुर्घटना
12 डिसेंबरला देखील अशीच एक दुर्घटना घडली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात एका खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झाला होता. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, बसचालक चैतू ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचं बसचालकानं सांगितलं होतं.
नागपुरात स्कूलबसचा अपघात
नागपुरात देखील नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात स्कूलबसचा अपघात झाला होता. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, बसचालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात आले होते. या अपघातात 14 वर्षाचा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर सम्यक कळंबे असे मयत विद्यार्थ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली होती.