जत, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ गावांनंतर अजून १० गावांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली होती.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra – Karnataka Border Issue) प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दोन्ही राज्यात सीमावादाचा मुद्दाही चांगलाच तापला आहे. त्यातच सीमावादाचा हा मुद्दा ताजा असतानाच सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील १८ गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दाखवली होती. सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांनी यापूर्वीच असा ठराव केला हेाता. जत आणि सोलापूरच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १८ गावांनंतर आता आणखी १० गावांनी कर्नाटकात जाण्याची मागणी केली होती.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गावात रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर यापूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात आम्ही त्यांच्या मतदारसंघात होतो. मात्र मुख्यमंत्री असूनही त्यांनी आमच्या गावांकडे दुर्लक्ष केलं, असही या गावकऱ्यांचं म्हणण आहे. असे असतानाता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जत तालुक्यातील पाणी प्रश्वावर मोठा तोडगा काढला आहे. जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, या तापलेल्या वातावरणात कर्नाटकाकडून बुधवारी (ता. ३० नोव्हेंबर) तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तिकोंडी तलाव एकाच दिवसात ओहरफ्लो झाला आहे. शिवाय, दाव्याप्रमाणे कर्नाटक नैसर्गिकरित्या या वंचित गावाला न्याय देऊ शकतो, असे भासविण्याचा प्रयत्न होत आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी जत तालुक्यातील लोकांची भेट घेतली. यावेळी लोकांच्या समस्या ऐकून घेत जानेवारी २०२३ मध्ये राज्य सरकारकडून 2 हजार कोटींचे टेंडर काढण्याचं आश्वासनही दिलं. रात्री दीड वाजता जतमधील लोकांची भेट घेतली. त्यांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता. नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी जत तालुक्यासाठी 2 हजार कोटींचं टेंडर काढण्याचे आश्वासन दिले.