मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या या निर्णयावर सातत्याने टीका आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता संजय राऊतांनी नाव व चिन्हासाठी मोठ्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “माझी खात्रीची माहिती आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे, आणि १०० टक्के सत्य आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं.” या ट्विटसोबत त्यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काही ओळीही शेअर केल्या आहेत. “ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली आहे. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे…कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली”, अशा या ओळी आहेत.
शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देण्यात आले. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वत्र नाराजी व निषेध नोंदवला जात आहे. तर शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जातोय. काही ठिकाणी तर, ठाकरे – शिंदे गट आमनेसामने येत आहे. यांमुळे राज्यात राजकीय संघर्ष ताणल्या गेल्याची चिन्हे आहे.