मुंबई : भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. दीदींच्या स्मृतिदिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लता दीदींच्या आवाजाला चिरंजीवी असं संबोधलं आहे. त्याचबरोबर राज यांनी नव्या पिढीसाठी संदेशही दिला आहे.
लतादीदींच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात कि, “आज दीदींच्या निधनाला एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार.”
“माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल. पण यापुढं कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तिकाचं आत ओढत राहिल, शांत करत राहिल. चिरंजीवी होणं काय असतं हे जर मला विचारलं तर मी यालाच चिरंजीवीत्व म्हणेन.”
“दीदींच्या आठवणी आहेत राहतील. पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. त्यांच्या स्मृतींना माझं विनम्र अभिवादन”, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.