यवतमाळ :- वणी, माजरी क्षेत्रांतर्गत एकोणा, माजरी, निलजाई पैनगंगा, मुंगोली या कोळसा खाणीतून कोळसा वाहतूकची कामे स्थानिक लोकांना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी वेस्टर्न कोल्ड फिल्डच्या अधिका-यांना केल्यात.
कोळसा खाणीमध्ये स्थानिक लोकांना रोजगार देण्यासंदर्भात व तेथील स्थानिक वाहतूकदारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, वणीचे उपविभागीय अधिकारी तसेच कामगार अधिकारी प्र.रा. महाले आणि वेस्टर्न कोल्ड फीलचे अधिकारी उपस्थित होते.
वनी व मांजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या कोळसा खाणींमधून कोळशाची वाहतूक करण्यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात ट्रक विकत घेतले आहेत. परंतु कोळसा वाहतुकीचे काम मोठ्या कंत्राटदारांना दिल्यामुळे स्थानिक गाडी मालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. अशा तक्रारी प्राप्त झाल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
यावेळी स्थानिकांना अडचणीत आणून जिल्हा बाहेरील लोकांना रोजगार देऊ नये. तसेच स्थानिकांना काम न देता इतर लोकांना रोजगार दिल्यास कंपन्यांच्या विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरतील आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कंपन्यांना काम करणे कठीण होईल. यामुळे केंद्र आणि राज्य शासनाचेही मोठे नुकसान होईल याची जाणिव ठेऊन कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अशा सुचना श्री राठोड यांनी केल्यात.
तसेच कोळसा खाणीमध्ये किती कामगार आहेत त्यांचे आधार कार्डसह यादी सादर करावी. कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. कामगारांचे वैद्यकीय तपासणी केली असल्यास त्याचा पुरावा, कामगारांची पोलीस पडताळणी तसेच पगार पत्रकाची माहिती सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्यात. यासाठी एक चमू नेमुन या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात.
कोल वॉशरीजमध्ये कोळसा स्वच्छ करण्याची व्यवस्था असते मात्र अनेक कोल वॉशरीजमध्ये कोळशाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे कोल वॉशरिज मध्ये कोणत्या नियमानुसार कोळशाचा साठा ठेवता येतो याची तपासणी महसूल, खनिज आणि कामगार विभागाचे अधिकाऱ्यांनी करावी. त्याचा अहवाल सादर करावा. अनधिकृत साठा केला असल्यास त्याला सील करावे असे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेत.
कोळशाची वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील धूळ उडून शेतकऱ्यांच्या पिकांवर जमा होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असुन कोळसा वाहतुक होणा-या रस्त्यावर नियमित पाणी शिंपडावे अशा सूचना आहे त्यांनी दिल्यात.
यासोबतच जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र उभारणीसाठी सीएसआर निधीतुन प्रस्ताव सादर करावे अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्यात.