राज्यातील राजकीय स्थिती आणि सध्याचं सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ विधान केलं आहे. त्याचवेळी आपण मध्यावधी निवडणूक होतील, असं म्हणालोच नव्हतो, असं स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिले. मागील काही दिवसांपासून राज्यात मध्यावधी निवडणूक लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते.
शरद पवार म्हणाले की, पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने आपण पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, आपण मध्यावधी निवडणूक होईल असं म्हणालो नव्हतो, असंही पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवसेनेला झालेली मोठी हानी आणि सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. त्यावर शरद पवार म्हणाले की, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावा लागतील, असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्दावर पवार म्हणाले की, काही तरी कारण द्याव, म्हणून ते देत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचं तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं कारण दिलं. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नसल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
औऱंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवारांनी भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात औऱंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता, अस पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली.
दरम्यान 11 जुलै रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या भवितव्यबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. यावर शरद पवार म्हणाले की, आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.