नुकताच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर गुरूवारी संजय राठोड यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीवर भाष्यही केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आपण शिवसेनेत आल्याचे राठोड म्हणाले.
“बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कॉलेज जीवनात आम्ही शिवसेनेत सहभागी झालो. खऱ्या अर्थानं कोणत्याही पदाची अपेक्षा मनात नव्हती. तेव्हा बाळासाहेबांचे विचारच मनात होते. राष्ट्रहित, अन्यायाच्या विरोधात लढणं त्यांचे विचार ऐकून आम्ही शिवसेनेत आलो. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही काम केलं. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली. बाळासाहेबांना आज पवित्र दिनी मंत्री झाल्यावर वंदन करावं म्हणून आज या स्मृतीस्थळावर येऊन दर्शन घेतलं,” असं संजय राठोड म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.