मुंबई : ठाकरे गटाच्या फायर ब्रॅंड नेत्या अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीपद यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. सोलापूर येथील महाप्रबोधन यात्रेत बोलत असताना सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कसे गेले याबद्दल भाष्य केलं.
राज्याच्या मुख्यमंत्री पदावरुन उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागलं. राजकीय वर्तुळात आजही हा चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, शिवसेनेच्या फायर ब्रॅंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्रीपद यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण यांसारखे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री घ्यायचं असेल, तर तुम्ही घ्या असं सांगितलं होत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली, असा खुलासा अंधारे यांनी केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली, आणि कपडे फाडणारी खाती शिंदे गटाला दिली. शिंदेंना बदनाम करण्याचे फडणवीसांचे षडयंत्र आहे. फडणवीस हा कपटनितीमध्ये एक नंबर माणूस आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.