खरीप हंगामपूर्व आढावा बैठक : जिल्ह्यात ९ लक्ष २ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन
Yavatmal : मागील वर्षासारखी यावर्षी युरियाची (Urea) टंचाई भासणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करावे. तसेच धामणगाव ऐवजी वाशिम आणि नांदेड जिल्ह्यातील रॅक पॉईंट काही तालुक्यांना जास्त जवळचा असल्यामुळे या दोन रॅक पॉईंटवर खताची जादा मागणी नोंदवावी, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे शनिवारी जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२३-२४ ची नियोजन बैठक पार पडली, यावेळी मंत्री राठोड बोलत होते. या बैठकीला खा. भावना गवळी, आ. मदन येरावर, प्रा. अशोक उईके, निलय नाईक, इंद्रनील नाईक, संजय रेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी खरीप हंगामातील नियोजनाचे सादरीकरण केले. यात त्यांनी जिल्ह्यात ९ लक्ष २ हजार ७२ हेक्टर वर खरिपाची पेरणी होणार असून यात सर्वाधिक महत्वाची कापूस, सोयाबिन आणि तुर ही तीन पिके आहेत. त्यापैकी ४ लक्ष ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, २ लक्ष ८६ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिन तर १ लक्ष २४ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर तुर पिकाची लागवड होणार आहे. यासोबतच ज्वारी ६५०० हेक्टर, उडिद ४९५० हेक्टर, मुंग ४५०० हेक्टर, तीळ १६७ हेक्टर, मका ८९० हेक्टर, बाजरी ९५ हेक्टरवर लागवड करण्याचे नियोजन आहे. कृषी निविष्ठा विक्रीसाठी जिल्ह्यात एकूण ६६४० केंद्र असुन कापुस बियाणे १४३३, इतर बियाणे १८१९, रासायनिक खते १९१५ तर किटकनाशकांसाठी १४७३ केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी फळबाग लागवड, औषधी व मसाला पिके, रेशीम व मत्स्य शेती, कृषी विज्ञान केंद्र, माती परिक्षण इत्यादी बाबत माहिती नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
बियाण्याची मागणी
जिल्ह्यात लागवडीसाठी बियाण्याची मागणी नोंदवली आहे. कापुस बियाण्यांचे २२ लक्ष ७५ हजार पॅकेट्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. सोयाबीनचे २ लक्ष १३ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असुन यासाठी ग्राम बिजोत्पादन मोहिम आणि शेतक-यांकडचे स्वत:चे बियाणे असे २ लक्ष ८८ हजार २४२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाबीज, राबिनी आणि खाजगी असे मिळून ७५ हजार ५५४ क्विंटल बियाणे आज उपलब्ध आहे.
खताची मागणी
जिल्ह्यात एकुण २ लक्ष १३ हजार ९२० मे. टन खताची मागणी आहे. तर आज पर्यंत उपलब्ध साठा ९६ हजार ९३३ मे टन आहे. मागणी मध्ये युरिया ६८ हजार मे. टन, डीएपी १६ हजार, एमओपी ७४००, कॉम्प्लेक्स ७७ हजार ५२०, एसएसपी ४५ हजार मे.टनाची गरज आहे. जिल्ह्यात माळटेकडी नांदेड, धामणगाव, बडनेरा, हिंगणघाट, चंद्रपुर, वाशिम, वर्धा,आणि अकोला या ठिकाणी रॅक पाँईंट आहेत.