जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध योजना कार्यक्रमांचा मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ
यवतमाळ : राज्य शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. भविष्यकाळात दिव्यांगांसाठी विविध योजनांची निर्मिती करून त्या माध्यमातून दिव्यांगांना सामान्यांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून जिल्ह्यातही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे. त्याचा प्रारंभ जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाचे उद्घाटन करून झाला, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्यातील पहिल्या डिजिटल दिव्यांग सहाय्य कक्षाचे लोकार्पण तसेच दिव्यांग उन्नती पोर्टलचे उद्घाटन, विविध विभागांच्या योजनांचे लाभ वाटप शनिवारी (दि. ३) जिल्हा परिषद सभागृह येथे करण्यात आला, यावेळी पालकमंत्री संजय राठोड बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक पवनकुमार बनसोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, चितंगराव कदम तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागाच्या मार्गदर्शन व घडी पुस्तिकेचे प्रकाशन, ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा आणि अमृत आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गरजू दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेमधील पाच टक्के सेस निधीतुन दिव्यांग सहायता वस्तुंचे वितरण आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तु देण्यात आली.
पालकमंत्री राठोड पुढे म्हणाले, जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सहाय्य डिजिटल कक्षाच्या निर्मितीमुळे दिव्यांगांची माहिती एकत्रितपणे जिल्ह्याच्या विविध ठिकाणी उपलब्ध होईल. दिव्यांगांनी सुद्धा उन्नाती पोर्टलवर आपली माहिती नोंदवावी. या माहितीच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोणत्या योजना कार्यान्वित करता येईल याचे नियोजन करता येईल, असे राठोड म्हणाले. यासोबतच जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांचे आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेऊन १५ डिसेंबरच्या आत आपली आरोग्य तपासणी करण्यात यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी दिव्यांग बचतगटासाठी नाविण्यपुर्ण योजना तयार करावी. महिला व शेतकरी बचतगटाला शेतात फवारणीसाठी ड्रोन देऊन त्यांना उत्पन्नाचे साधन देता येईल का, याचाही अभ्यास करून योजना तयार करावी, असेही संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.
‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा आणि अमृत आवास अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ
यावेळी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियानाचा शुभारंभही करण्यात आला. पालकमंत्री राठोड यांनी सर्व महिलांना आश्वासित करत सांगितले की, यापुढे कोणत्याही माता-भगिनीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन जाताना दिसणार नाही. गावातील सर्व नागरिकांच्या घरी पिण्याचे शुद्ध पाणी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यावेळी मंत्री राठोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी राबवलेल्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
विविध मार्गदर्शन पुस्तिका व घडिपत्रिकेचे प्रकाशन
यावेळी मान्यवरांच्या हस्ते झेप,आरंभ उपक्रमांतर्गत मार्गदर्शक पुस्तिका तसेच महादीप या उपक्रमांतर्गत पुस्तिकेचे विमोचन पार पडले. त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, की शासकीय योजनांमध्ये दिव्यांगांना प्राथमिकता देण्यात येईल. जिल्हा परिषदेने झेप, आरंभ, महादीप असे महत्वाचे ड्रिम प्रोजेक्ट राबवले, जे महाराष्ट्रातील पायलट प्रोजेक्ट आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदच्या सर्व चमूचे त्यांनी अभिनंदन केले. लोकांच्या जगण्याशी निगडित विभागांनी लोकसेवेचे काम करावे. दिव्यांगांनी आजच्या सादरिकरणातुन आम्हा सर्वांना ऊर्जा आणि प्रेरणा देण्याचे काम केले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
तर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदमध्ये सर्व कामांसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच दिव्यांग मुले वयाने मोठी झाल्यावर त्यांच्या आई-वडिलांना काळजी घेणे अवघड होते, म्हणुन त्यांना अर्थसहाय्याची योजना यावर्षीपासुन सुरु केली आहे. महादीप योजनेसाठी यावर्षी विद्यार्थी संख्या वाढविण्यात येणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. महादीप म्हणून तयार करण्यात आलेले पुस्तक मुलांना वाचण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी झेप उपक्रम राबविण्यात येत आहे. आरंभ प्रोजेक्ट राबवलेला यवतमाळ जिल्ह्याचा हा पायलट प्रोजेक्ट होता. हा प्रकल्प राबवताना केंद्र शासनाची, युनिसेफची टीम पाहणी करून गेली आणि आता हा प्रकल्प राज्यस्तरावर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी स्वत: मागवली भेटवस्तू
यावेळी स्वच्छतादूत म्हणून कार्यरत असणारी इयत्ता बारावीत शिकणारी खुशी डवरे आणि जोया शेख जहीर या दिव्यांग मुलींनी नृत्य तर साक्षी अलोणे हिने ‘जय शारदे वागेश्वरी’ हे गीत सादर केले. या तीनही विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने सभागृह अक्षरश: गहिवरले होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातिल प्राविण्य, संगीत व नृत्याविष्कार बघुन पालकमंत्री राठोड भारावुन गेले. त्यांनी दिव्यांग मुलांना देण्यासाठी स्वतः भेटवस्तू मागवून नंतर ती स्वहस्ते त्यांना दिली. पालकमंत्री यांची दिव्यांगांप्रती संवेदनशीलता यातुन प्रकट झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विनय ठमके तर सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले.